भारतीय सिनेश्रुष्टीतील एक प्रभावशाली आणि सर्वात महान नेत्यांपैकी एक असे अमिताभ बच्चन यांच्या विषयी वाचण्यात आलेली प्रेरणादायी पोस्ट 

अमिताभ व्हा

 अमिताभ बच्चन यांची एक बातमी परवा वाचनात आली... ती अशी की, यंदा 11 ऑक्टोबरला बच्चन साहेब चित्रिकरणात व्यग्र  होते. कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे वाढदिवस तर त्यांनी साजरा केला नाहीच. पण ते घरीही नसावेत. आपल्या वाढदिवशी कामात व्यस्त राहायला त्यांना आवडतं... असं त्यांच्या कुटुंबियांनी यावर सांगितलं.

ही बातमी आल्यानंतर त्यावर आलेल्या कमेंट्स मधली एक कमेंट फार इंटरेस्टिंग होती. त्यातला कमेंटकर्ता म्हणत होता, ' बच्चन 78 वर्षाचा झाला. त्याचा एक पाय कबरीत आणि एक पाय केळ्याच्या सालीवर असून पण तो काम करतोय   आता ही पोस्ट तशी असभ्य भाषेतलीच आहे.. पण ते खरंच आहे. खरंतर सहस्रचंद्र दर्शनसोहळा जवळ येत असताना खरंतर मंडळी जास्तीतजास्त घरी असतात.  कुटुंब वत्सल होतात. ज्येष्ठ होतात. बच्चन भाईंचं उलटंच झालं...


कसं आयुष्य असतं बघा.. जिथं निवृत्ती घ्यायला हवी तिथं बच्चन साहेबांनी भरारी घेतली. ए.बी.सी.एल. ही थाटलेली कंपनी जेव्हा गाळात गेली.. जेव्हा डोक्यावर कर्ज झालं... तेव्हा त्यांचं वय किती होतं...?? 59-60. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला हा महानायक लोकांचं अमाप प्रेम, प्रसिद्धी, पैसा, मान-मरातब मिळवून कंगाल झाला होता. तेव्हा बिग बी च्या वयाची साठी आली होती...


अमिताभ बच्चन यांनी थुकरट जाहिराती केल्या की त्यांच्या नावाने घरात बसून बोटं मोडणारे आपण...

त्यांच्या फोटोवर... कमेंटवर त्यांची टर उडवणारे आपण...

सहा महिने हातात काम नाही म्हणून नैराश्यग्रस्त होणारे आपण...


कल्पना तरी करू शकतात का. की हजारो कोटींचं कर्ज डोक्यावर घेऊन रस्त्यावर यायची वेळ ओढवलेल्या अमिताभ बच्चनवर काय परिस्थिती आली असेल त्यावेळी...??

त्यावेळी नेमकं काय घडलं होतं...?? याचा हा किस्सा जरा वाचाच. हे आत्ता वाचणं अत्यंत आवश्यक आहे...

 एकिकडे लॉकडाऊन आहे. हातात काम नाही... नैराश्य येत असताना... जरा स्फूर्तीदायी गोष्टी वाचल्या की बऱ्या असतात...

.....

तर हा काळ होता त्यांच्या साठीचा... म्हणजे 20 वर्षापूर्वीचा... म्हणजे जवळपास 2000 सालाच्या आसपासचा... ए.बी.सी.एल. पुरती दिवाळखोरीत निघाली होती. सगळे पैसे कर्ज भागवण्यात संपले होते. एव्हाना अमिताभ बच्चन यांनी सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला होता. कारण, त्यांचे लाल बादशाह, छोटे मियां बडे मियां आदी सिनेमे पण पडले होते. बच्चन यांचं मार्केट जवळपास गेलं होतं... आर्थिक फटका तर बसला होताच, पण सार्वजनिक जीवनात जी व्हॅल्यू अमिताभ बच्चन या नावाला होती तीही पुरती पडली होती... अभिषेकही त्यावेळी नट म्हणून नावारूपाला आला नव्हता...

हा काळ असा होता, जेव्हा गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन यांच्याकडे काम मागायची वेळ आली नव्हती. मोठेमोठे निर्माते त्यांच्याकडे रांगा लावत होते. त्यांच्यासाठी सिनेमे लिहित होते. सिनेमासाठी त्यांच्या डेट्ससाठी महिनोमहिने थांबत होते. पण आता परिस्थिती बदलली होती. 1998 पासून तर परिस्थिती आणखीच गंभीर होत गेली होती. हातातलं काम गेलं होतं...

आणि मग बच्चन साहेबांनी निर्णय घेतला.. काम मागण्याचा...

सर्वसाधारणपणे जे निवृत्तीचं वय मानलं जातं, त्या वयात बच्चन साहेब काम मागायला बाहेर पडले. त्याचाही एक अजब किस्सा आहे...

बच्चन यांच्या जुहूच्या बंगल्यापासून थाेड्याच अंतरावर यश चोप्रा यांचा बंगला आहे. बच्चन यांनी यश चोप्रा यांच्याकडे जायचं ठरवलं, दिवस ठरला. सकाळी घरातून अमिताभ बाहेर पडू लागले. अभिषेकच्या लक्षात आलं की अमिताभ गाडी घेत नाहीयेत, ते चालतच जाताहेत. अभिषेकने बाबांना गाडी घेऊन जाण्याबद्दल सांगितलं. तर बच्चन म्हणाले, मी काम मागायला जातोय, आणि काम मागायला जाताना गाडी घेऊन जाणं हे मला योग्य वाटत नाही. क्षणाचीही वाट न बघता अमिताभ बच्चन घरासमोरच्या फुटपाथवरून चालू लागले. यश चोप्रा यांच्या सुरक्षा रक्षकांना बच्चन चालत येत असल्याचं कळल्यावर तिथे एकच तारांबळ उडाली.

तारांबळ उडणारच. या शतकातला हिंदीतला महानायक चालत येत होता... ज्याने अनेक हिट चित्र देऊन सिनेसृष्टीत वेगळं स्वत:चं स्थान व मानमरातब मिळवलं, ज्यांच्या सिनेमाने अनेकांची पोटं भरली, कित्येकांचे संसार उभे राहिले... अनेकांची मनं मोकळी केली तो महानायक अमिताभ बच्चन चालत येत होता. ही गोष्ट यश चोप्रा यांना कळली. चोप्रा पळत आपल्या वरच्या मजल्यावरून खाली धावत आले. त्यांनी बच्चन साहेबांना आत घेतलं. वर घरी नेलं... बच्चन अत्यंत शांत होते. यश चोप्रा यांनी असं अचानक येण्याचं कारण विचारल. तेव्हा बिग बी उद्गारला.. चोप्रा साहेब.. मला काम हवंय. चोप्रा म्हणाले, तू आत्ता असा का आलायस...?? तुझे किती पैसे बाहेर देणं आहे...??


त्यावर अमिताभ म्हणाले... जर पैसे मागून द्यायचे तर माझ्याकडेही असे काही लोक आहेत चोप्रा साहेब... पण मी आता तुमच्याकडे या करीता आलोय की, मला काम हवंय. यापूर्वी मी केलेली कामं तुम्हाला माहीत आहेतच. माझ्या योग्य काही काम असेल तर...

चोप्रा यांनी तातडीने आपल्या माहितीतल्या लोकांना तिथूनच फोनाफोनी सुरू केली. देशाच्या महानायकाला काम हवं होतं.

दोन तीन फोन केल्यावर लक्षात आलं... काही ठिकाणचं चित्रिकरणं सुरू झालं होतं... काही ठिकाणी बच्चन यांना साजेसा रोल नव्हता. चोप्रा यांचा असाच एक फोन गेला, विधू विनोद चोप्रा यांना... विधूजी त्यावेळी एका सिनेमाची जुळवाजुळव करत होते. त्या सिनेमात एक भूमिका होती. ती विधू यांनी बच्चन यांना द्यायची ठरवलीही. पण सिनेमाचं चित्रिकरण सुरु व्हायला वेळ होता. पण बच्चन यांना तर तातडीने काम हवं होतं...

लगेच यश चोप्रा यांनी आदित्यला बोलावलं... आदित्यने तातडीने हालचाल करून बच्चन यांना समोर ठेवून एक सिनेमा लिहायला घेतला. चोप्रा गटातल्या सगळ्या मोठ्या कलाकारांपैकी कोण यात येतील याची काळजी घेतली गेली आणि मग एक सिनेमा तयार झाला... मोहोब्बते.

शाहरुख खान, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन, जिमी शेरगील आदी लोकांना घेऊन सिनेमा तयार झाला... आणि मोहोब्बतेनं नवा इतिहास घडवला. एका महानायकाला नवसंजीवनी मिळाली...

....

हे सगळं होत असतानाच, विधू विनोद चोप्रा यांच्या सिनेमाची जुळवाजुळवही पूर्ण झाली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनीही अमिताभ बच्चन यांना सिनेमात एक भूमिका देऊ केली. जी बच्चन यांनी नेहमीप्रमाणे डंके की चोट पर साकारली. त्या सिनेमाचं नाव होतं एकलव्य. सिनेमा हिट झाला. सिनेमाने नफा कमावल्यावर विधू विनोद चोप्राने अत्यंत प्रेमाने आणि आदराने बच्चन यांच्या वकुबाला साजेशी गाडी त्यांना भेट म्हणून दिली.. ती गाडी होती रोल्स रॉईस...

त्याच्या बातम्याही आल्या होत्या पेपरात. मग कौन बनेगा करोडपती हा शो आला... त्यानंतर जे झालं ते भारतीय मनोरंजनसृष्टीत ऐतिहासिकच होतं.

...

कोणताही महानायक केवळ प्रसिद्धीनं घडत नाही. ती प्रसिद्धी जशी मिरवावी लागते तशी ती पचवावीही लागते. अमिताभ बच्चन यांना त्या वाईट काळामध्ये बसलेले धक्के कमालीचे खंतावणारे होते. म्हणूनच त्यानंतर बच्चन यांनी आपल्याला जे मिळेल त्या कामातून पैसे कमावण्याचं ठरवलं. आपण दिवाळखोर होण्याचा धक्का त्यांच्या इतका जिव्हारी लागला की त्यांनी मिळतील त्यातून पैसे उभे करायला सुरूवात केली. आणि मिळेल ते काम करायला घेतलं. त्यानंतर जे घडलं तो इतिहास आहे...

अमिताभ बच्चन.. हा इसम नजरेत न मावणारा असला तरी तो माणूसच आहे... त्यालाही मन आहे...

जे कधीकाळी दुखावलं गेलं होतं. परिस्थितीने म्हणा.. किंवा आणखी कशानेही... पण त्यात ते खचले नाहीत, बिकट परिस्थितीचा सामना केला, लढले, पण त्यातून ते तावून, सुलाखून बाहेर आले. ते कायमचे.....

अमिताभ बच्चन होणं सोपं नसतं ते यासाठीच...

परिस्थितीने नामोहरम केल्यानंतरही आपल्या कामावर प्रचंड श्रद्धा आणि कष्ट करायची तयारी ठेवतो आणि मेहनतीने पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेतो तोच बच्चन असतो

परिस्थितीला भिडण्याचा हा अमिताभ बच्चन यांचा अंगभूत गुण आपल्यालाही लाभो...



Comments